इसापनितीच्या गोष्टी
इसाप कोण होता आणि इसापनीती म्हणजे काय?
इसाप व त्याच्या जगप्रसिध्द इसापनितीची एक ओळख ज्या वेळी शब्दांना अर्थ नव्हता, वेदनेला भाषा नव्हती, मानवता आणि करुना बंदीवान होती. अशा काळात बोलण्याची हिंमत करणारी साहसी जिभ म्हणजे इसाप.
इसाप व त्याच्या जगप्रसिध्द इसापनितीची एक ओळख ज्या वेळी शब्दांना अर्थ नव्हता, वेदनेला भाषा नव्हती, मानवता आणि करुना बंदीवान होती. अशा काळात बोलण्याची हिंमत करणारी साहसी जिभ म्हणजे इसाप.
गर्वाचे घर खाली
कोंबडयांवरून जुंपलेल्या भांडणामध्ये एक कोंबडा खूप जखमी होऊन पराभूत झाला होता. बिचा-याने लाजेने चूर होऊन एका अडगळीमध्ये तोंड लपविले.
विजयी झालेला दुसरा कोंबडा एका उंच भिंतीवर दिमाखाने चढला व अगदी उच्च स्वरात त्याने आपण जिंकल्याच्या आनंदात त्याने एक ललकारी मारली.
त्याला पाहाताच, एका गरूडाने त्याच्यावर झेप टाकली व त्याला उचलून तो आकाशात उंच उडाला.
पराभूत झालेला कोंबडा तोंड लपवनू बसलेला असल्यामुळेच बचावला नि अखेर कोणी प्रतिस्पर्धी न उरल्यामुळे निश्चिंतपणाने त्या कोंबडयांमध्ये खेळूबागडू लागला.
कथासार - गर्वाचे घर नेहमी खालीच असते. घमेंडीत वावरणा-यांचा सदैव नाश होतो.
एक कोळी होता. रोज मासे पकडायचे, ते विकायचे, आणि जे पैसे येतील त्यावर उपजीविका करायची असा त्याचा जीवनक्रम होता. एक दिवस, दिवसभर प्रयत्न करूनही त्याला मासे सापडले नाहीत. शेवटी संध्याकाळी त्याच्या जाळयात लहानसा मासा सापडला.
तो मासा, कसेबसे श्वास घेत कोळयाला म्हणाला, 'बाबारे, मी तुझ्याकडे माझ्या प्राणांची भीक मागतो. मी इतका लहान आहे की, माझी बाजारात काहीही किंमत यायची नाही. कोणी मला खाल्ले तर त्याचे पोट देखील भरणार नाही. माझ्या शरीराची अजून वाढ व्हायची आहे. कृपा कर. मला पुन्हा पाण्यात सोडून दे. मी मोठा गरगरीत झाल्यावर माझा मेजवानीसाठी उपयोग होईल. त्यावेळी मला विकून तुला खूप पैसे मिळतील. आज तू मला सोडून दे.'
कोळी त्या माशाला म्हणाला, 'उद्याचे कोणी पाहिले आहे? शंकांनी घेरलेल्या उद्याच्या लाभासाठी आजच्या हातात गवसलेल्या लाभावर पाणी सोडणे अगदी मूर्खपणाचे कृत्य होईल. त्यामुळे मी तुला सोडू शकत नाही.
तात्पर्य - झाडातल्या दोन पाखरांच्या मागे लागून, हातातले एक गमावून बसण्यात अर्थ नाही.
मैत्रीच्या मर्यादा
एका गावाच्या एका पेठेत एक कोळसेवाला राहात होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, 'धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अर्ध्या घरात तो राहीला तर सोबत होईल नि हळुहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल.'
एक दिवस कोळसेवाल्याने धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखविले. कोळसेवाला पुढे म्हणाला, 'या महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही होईल!'
'फार फार आभारी आहे. तुम्ही खरोखरच फार चांगले आहात!' धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. 'बाकी सर्व ठीक आहे हो, पण तुमचं आमचं एकत्र राहाणं जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापीटा करून जे जे स्वच्छ करीत जाईन, ते ते एका क्षणांत काळंकुट्टं होईल, तुमच्या शेजारानं! माफ करा!!'
तात्पर्य - चांगल्या हेतूने होणा-या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात.
एका सापाच्या डोक्यावर एक गांधीलमाशी बसली व दंश करून ती त्याला सतावून सोडू लागली.
साप त्यामुळे अगदी वेडापिसा झाला. काय करावे व तिच्या तडाख्यातून कसे सुटावे, हे त्याला मुळीच कळेना. रागारागाने तो तिचा सूड उगवण्यासाठी मार्ग शोधू लागला.
तेवढयात तेथून एक बैलगाडी जाताना त्याला दिसली. सापाने आपल्या शत्रूला ठार करण्यासाठी तत्काळ त्या बैलगाडीच्या चाकाखाली आपले डोके ठेवले. त्या चाकाखाली ती गांधीलमाशी चिरडून मेलीच, पण तिच्याबरोबर त्या सापाचीही सपाटपोळी झाली.
तात्पर्य - आपल्या शत्रूंना जिवंत ठेवण्यापेक्षा काही लोक त्यांच्याबरोबर स्वत:चाही मृत्यु झालेला पत्करतात. सूडाने आंधळी झालेली माणसे आत्मघात व समाजघातच करतात. सूडबुध्दीने जगाचे एकूण अकल्याणच जास्त होते
वात्सल्य
एकदा देवांनी जाहीर केले की, सा-या पशूंमध्ये ज्याचे मूल सर्वात सुंदर दिसेल त्याला एक मोठे बक्षिस मिळेल. ही सूचना ऐकल्यावर सर्व पशु आपापल्या मुलांना घेऊन प्रतियोगितेंच्या ठिकाणी हजर झाले. त्यातच एक माकडीण होती. तिच्या हातांच्या झुल्यात ती आपले चिमुकले पिलू झुलवत होती. नकटया, चपटया नाकाचे, अंगावर केस असलेले ते पिलू मजेशीर दिसत होते. डोक्याचा कोबीचा कांदाच जणू! एकंदरीत ते ध्यान पाहता सारे पशु खदखदा हसू लागले.
माकडिणीला जाणवत होते की तिची टर उडवित आहेत. माकडीणीने आपल्या चिमुकल्याला हृदयाशी अधिकच कवटाळून धरले आणि ती म्हणाली, 'सुंदरपणाचे बक्षिस देवांनी हवे त्याला द्यावे. पण मला मात्र माझे मूलच सर्वात सुंदर दिसते आणि तेच माझे सर्वात मोठे बक्षिस आहे...'
तात्पर्य - आपले मूल कसेही असले तरीही प्रत्येक आई त्याच्यावरून सारे जग ओवाळून टाकते.
एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता.
हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले.
डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही.
तात्पर्य - केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा.
देवाची चोरी
शेतात काम करता करता एका शेतक-याचे फावडे हरवले. त्याला वाटले, मजुरांपैकी कोणी ते चोरले असावे. त्याने कसून चौकशी केली, पण कोणीही कबूल होईना. कोणीही काही त्याबाबत माहीत असल्याचेही सांगेना. तेंव्हा त्या शेतक-याने सा-या मजुरांना घेऊन जवळच्या गावातील मोठया देवळात जाऊन शपथ घ्यायला लावायचे, असे ठरविले.
ठरल्याप्रमाणे सर्व मजूरांना घेऊन तो शेतकरी त्या जागृत देवस्थानी गेला. देवळाच्या दारातच दवंडीवाला दवंडी पिटत होता. थाळी पिटून तो मोठमोठयाने म्हणत होता की, 'लोक हो, ऐका. आपल्या या जागृत देवस्थानातील देवांचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरीची किंवा चोराची पुराव्यासह जो बित्तंबातमी देईल त्याला कोतवालसाहेब माठे बक्षिस देतील. ऐका हो, ऐका...'
ती बातमी ऐकून, शेतक-याला मोठा अचंबा वाटला, आणि तो स्वत:शीच म्हणाला, 'चला, आल्या पावली घरी परत गेलेलेच बरे. इथल्या देवाला प्रत्यक्ष त्याच्याच देवळातल्या मौल्यवान वस्तू कोणी चोरल्या ते शोधून काढता येत नाही, तर माझं फावडं चोरणारा चोर, देव कसा काय शोधून काढेल?
तात्पर्य - देवच दुबळे ठरले तर त्यांच्यावर भरीभार का टाका? आपल्या प्रयत्नाइतका सामर्थ्यशाली देव दुसरा कोणी नाही.
आपल्या छानदार खोगिराची एका घोडयाला घमेंड वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाढव चालला होता. तो त्या घोडयाला वाट करून द्यायला जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा उतावीळपणे त्याला म्हणाला, 'ए, जा रे, हट्. चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच खाशील.'
बिचारे गाढव गप्पच राहीले. पण घोडयाचे ते उध्दटासारखे वागणे त्याच्या मनात राहीले. काही दिवसांनी तो घोडा म्हातारा व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका शेतकऱ्याला विकला. आता त्या शेतक-याच्या शेतखणाची गाडी ओढून नेण्याचे काम त्याला करावे लागत होते.
थकला भागला तो घोडा असाच एकदा रस्त्यावरून जात असताना पूर्वीचे ते गाढव त्याला भेटले.
त्याला पाहताच खोचकपणे गाढवाने त्याला विचारले, 'ओऽहो, कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीचं छानदार खोगिर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी पाळी येईल, असं वाटलं होतं का तुम्हाला?...'
तात्पर्य - जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे सदैव ध्यानी बाळगावे.
जगातला मोठा गुन्हा
तोकडया दृष्टिचे विचार
एका फासेपारध्याच्या जाळयात एक कवडा सापडला. त्याला पकडून न्यायला तो जेंव्हा जवळ आला, तेंव्हा तो पक्षी अगदी गयावया करून म्हणाला, 'पारधीदादा जाऊ द्या मला. मी वचन देतो की, तुम्ही मला सोडलात तर दुस-या कवडयांना जाळयात पकडून देईन मी.'
पारधी त्याच्यावर ओरडला, 'छे, मग तर मुळीच नाही सोडत तुला. तुझ्यासारख्या विश्वासघातक्याला कशाला सोडायचं? जो आपल्या निरूपद्रवी मित्रांचा विश्वासघात करू इच्छितो, तो साक्षात मृत्युपेक्षाही भयंकर!'
तात्पर्य - विश्वासघातासारखा जगात दुसरा भयंकर गुन्हा नाही
वादळी नि वाईट हवेमुळे एक शेतकरी आपल्या घरीच कित्येक दिवस अडकून पडला होता. बाहेर जाता येत नाही, अन्न आणता येत नाही, हे पाहून शेवटी त्याने आपली मेंढरे मारून खायला सुरवात केली.आणखी काही दिवस गेल्यावर त्याने आपल्या बक-यांचा फन्ना उडवला. आणखी काही दिवसांनी तर त्याने आपल्या बैलांवरही हात टाकला व आपली भूक भागवली.
हे सारे पाहून त्याचे कुत्रे एकमेकांत कुजबुजू लागले की, 'पाहिलंत ना सारं, काय केलंन आपल्या धन्यानं आतापर्यंत? अजून काही विपरित घडलं नाही, तोवरच शहाणपणानं आपली तोंडं काळी करूया आपण! अरे, जो धनी आपल्याबरोबर श्रम करणा-या बैलांनाही शिल्लक ठेवण्यास तयार नाही, तो भुकेने पिसाळल्यावर अखेर आपल्यावर देखील हात टाकणार नाही, याची शाश्वती कोणी सांगावी? चला, आताच पळा!'
तात्पर्य - जे आपल्या मित्रावरही हात टाकायला नि त्याचा दुरूपयोग करायला कचरत नाहीत, त्यांच्यापासून सावध राहून नेहमी चार हात दूर असणे बरे! त्यांची ती वरवरची दिखाऊ नीती नि प्रतिष्ठा संशयास्पद व धोकेबाज समजणे शहाणपणाचे होय!
धुळीने भरलेले दोन प्रवासी. थकलेले, भागलेले, वणवण उन्हामध्ये उघडया रखरखीत रस्त्यावरून चालत होते. डोक्यावर भयंकर ऊन 'मी' म्हणत होते. इतक्यात रस्त्याच्या कडेला त्यांना एक मोठे झाड दिसले. मोठया आनंदाने ते तिकडे वळले. त्यांनी झाडाखाली आसरा घेतला. विसाव्यासाठी त्यांनी तिथेच बसकण मारली. दूरदूर विस्तारलेल्या झाडाच्या फांद्यांमुळे तिथे बराच गारवा होता. प्रवाश्यांचा कासाविस जीव झाडाच्या सावलीमध्ये सुखावला.
विश्रांती घेता घेता तिथे पहुडलेल्या एकाची नजर झाडाच्या फांदीकडे गेली. तो आपल्या सहप्रवाशाला म्हणाला, 'फुकट हे एवढं मोठ्ठं झाड आहे. फळं धरत नाही. काही नाही. काय उपयोग या झाडाचा माणसाला? '
ते ऐकल्यावर संतापून झाड म्हणाले, 'किती कृतघ्न रे तूं ! तापलेल्या उन्हातून इथे आलास तो माझा आसरा घेण्यासाठी. या क्षणी प्रत्यक्ष माझ्या सावलीत बसलेला आहेस, तरीसुध्दा तू मला निरूपयोगी म्हणून हिणवत आहेस...'
तात्पर्य- काही काही प्रकारची साधीसुधी सेवा फारच महत्त्वपूर्ण असली तरी तिचा उपयोग घेणा-यांना मात्र कसलीच कृतज्ञता वाटत नाही.
एकसाप एकदा नदीत पडला. पुराच्या जोरदार प्रवाहाबरोबर तो वेगाने वाहून चालला होता. तेवढयात एक काटेरी झुडुप त्याच्याजवळून वाहात चाललेले त्याला दिसले. कसेबसे तो त्याच्यावर चढून बसण्यात तो यशस्वी झाला आणि मग ते सारे लाटांवर वेगाने खाली वाहात जाऊ लागले.
किना-यावर एक कोल्हा होता. काटेरी झुडुप व त्याच्यावर चढून बसलेला साप पाहून कोल्हा म्हणाला, 'वा:! सुंदर! आत बसलेला तो प्रवासी आणि त्याला वाहून नेणारी ती नाव, दोन्हीही एकमेकांना कशी अगदी शोभून दिसतात!'
तात्पर्य - कधी कधी चांगल्याप्रमाणे वाईट गोष्टीही जगात परस्परांना साजेशा, शोभून दिसतात.
मन वळवणे श्रेष्ठ
उत्तरवारा व सूर्यनारायण यांची अधिक श्रेष्ठ व शक्तीमान कोण, याबद्दल एकदा खूप हमरी-तुमरी झाली. शेवटी ते सिध्द करण्याचा एक मार्ग त्यांनी निश्चित केला. रस्त्याने जाणा-या एका प्रवाशाला त्याच्या अंगावरील कपडे काढायला लावण्यात जो यशस्वी होईल तोच श्रेष्ठ व विजयी होय, असे दोघांनी ठरविले.
पवनराजाने प्रवाशावर पहिला हल्ला केला. सोसाटयाचा वारा सुटला. वा-याच्या त्या प्रचंड सोसाटयात सापडताच प्रवाशाने आपल्या अंगावरील कपडे आपल्या शरीराभोवती अधिक लपेटून घेतले. इतकेच नाही, तर वा-याने जेंव्हा अधिक उग्र स्वरूप धारण केले, तेंव्हा तर त्या माणसाने आणखी एक वस्त्र आपल्या अंगाभोवती लपेटून घेतले. अखेर कंटाळून जाऊन वा-याने आपण हरल्याचे कबूल केले, व त्या प्रवाशाला सूर्य नारायण कसे काय वागवतील, ह्या उत्सुकतेने वायुराज गंमत पाहू लागले...
सूर्य प्रथम उबदारपणे प्रकाशू लागला, तसा प्रवासी शांत झाला. त्याने बाहेरचे लपेटलेले वस्त्र बाजूस सारले. हळुहळू आपली प्रखरता वाढवीत सूर्य तेजाने तळपू लागला. अखेर उष्णता असह्य होत चालली, तसतशी आपल्या अंगावरील सारी वस्त्रे त्या प्रवाशाने एकामागून एक काढून टाकली. या नंतरही उष्णता आणखी असह्य झाल्यावर तो प्रवासी जवळच्या नदीत अंघोळ करावयास उतरला.
तात्पर्य बळजबरीपेक्षा कुशलपणे दुस-याचे मन वळविणे, हेच जगात अधिक यशकारक असते, हेच खरे. झोटींगांपेक्षा प्रेमदेवताच जगाचा अधिक लवकर विकास करू शकते.
एका धनगराला एक नुकतेच जन्मलेले लांडग्याचे पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर वाढवले व मोठे केले.
याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील होई.
पण गंमत मात्र अशी की, त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी. अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा आनंद लुटी.
धनगर मात्र बेसावध होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले.
तात्पर्य - वाट्टेल तो प्रयत्न केला, तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही.
विद्या विनयेन शोभते
राजा ज्ञानसेनच्या दरबारात दररोज शास्त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्त्रासंबंधी चर्चा करण्यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्हणून घोषित केले जात असत त्यांना राजा धन आणि मान देऊन सन्मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्या दरबारात असाच शास्त्रार्थ चालला होता. त्या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्यात आले. राजाने त्याचा भरसभेत सत्कार केला व मान देण्यासाठी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्याच्या विद्वत्तेच्या सन्मानार्थ राजा स्वत: त्याला चव-या ढाळत त्याला घरापर्यंत सोडण्यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्मानाने घरी आला हे पाहून भारवीच्या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्याबरोबर भारवीने मातेला साष्टांग नमस्कार केला पण पित्याला मात्र उपेक्षेने उभ्याउभ्याच नमस्कार केला. त्याच्या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्याने त्याच्या त्याही नमस्काराचा स्वीकार केला आणि त्याला चिरंजीवी भव असे म्हटले. गोष्ट इथेच संपली असे नाही. मात्यापित्यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्हते. याचे कारणही स्पष्ट होते की भारवीला यश पचविता आले नव्हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्या धुंदीत शिष्टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्त्रार्थ करायला जाणार होतास त्याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्या काळात ते परमेश्वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्यांनी कितीतरी स्वत:च्या इच्छा दाबून ठेवल्या व तुला शास्त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्मत्त होऊन तू त्यांची उपेक्षा केलीस हेच आम्हा दोघांच्या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्याने मातापित्याच्या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्यात पुन्हा कधीही त्याने मातापित्यांची सेवा करण्यात कसूर केली नाही.
तात्पर्य :- आयुष्यात आपल्याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास मिळाली तरी त्यापाठीमागे आपल्या आईवडीलांची पुण्याईअसते हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते.
----------------------------------------------------------------------------------
अनुभवाच्या जोरावर यश
एका व्यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्यापारी म्हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्यापा-याने विचार केला, आपण पहिल्यांदा जाण्यात फायदा आहे, रस्त्याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्या किंमतीवर सामान विकेन. त्याने पहिल्यांदा जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्या व्यापा-याला वाटले, या व्यापा-याच्या जाण्याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्या खोदलेल्या विहीरीचे पाणी प्यायला मिळेल. शिवाय चांगल्या किंमतीवर सौदा करता येईल. दुस-या व्यापा-याच्या माणसांनी पाण्याने भरलेल्या घागरी बरोबर घेतल्या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्यांना भेटले, त्या लोकांनी व्यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्याची गरज नाही. व्यापा-याने त्यांचा सल्ला ऐकला. त्या रात्रीच त्या व्यापा-याचा काफिला लुटला गेला. व्यापारीही मारला गेला.एक महिन्याने पहिला व्यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्हा दरोडेखोराच्या माणसांनी त्यालाही खोटे बोलून भुलविण्याचा प्रयत्न केला पण पहिला व्यापारी त्यांच्या बोलण्याला भुलला नाही. व्यापा-याच्या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्यापा-याला विचारले असता व्यापारी म्हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्यापारी पुढे गेला व त्याच्या धंद्यात अशा छोट्याशा गोष्टींमुळे तो यशस्वी झाला.
तात्पर्य : अनुभवाने माणूस यशस्वी होतो.
संत राबिया आणि चोर
संत राबियाची ईश्वरभक्ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्वराचे स्मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्वरनिर्मिती मानून त्यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्त असताना तिच्या घरात चोर घुसला. त्याला राबियाच्या घरी धन तर सापडणार नव्हते. त्याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. त्याने समोर पडलेली चादर उचचलली. चादर घेऊन तो जात असताना त्याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली, काही दिसेनासे झाले, त्याने डोळे चोळून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्याला थोपटून पाहिले. तेव्हा त्याला बरे वाटले. चादर उचलून तो चालू लागला की तेव्हा पुन्हा त्याची तीच अवस्थ झाली. चादर खाली ठेवली की त्याला बरे वाटत असे. तो हैराण झाला. तेव्हा त्याला कोणीतरी म्हटल्याचा भास झाला,’’ तू स्वत:ला का अडचणीत टाकतो आहेस, राबियाने स्वत:चे अस्तित्व माझ्याकडे सोपवून दिले आहे. जेव्हा एक मित्र झोपतो तेव्हा दुसरा जागा असतो. मग त्याची कोणतीही वस्तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन’’चोराने तेथे निद्रिस्त असलेल्या राबियाचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला.
तात्पर्य :-ईश्वराशी आपण एकरूप झालो की ईश्वरही आपली मनापासून काळजी करतो.
काका कालेलकर
काका कालेलकर उच्च कोटीचे चिंतक, लेखक होते. त्यांची विचारक्षमता प्रत्येक विषयात खोल आणि व्यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्यांच्या आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होताच अनेक मित्रमंडळी आणि शुभचिंतक त्यांना भेटायला आले. काका सर्वांशी मोठ्या आत्मीयतेने भेट देत असत. एके दिवशी काकांना भेटायला त्यांचे काही मित्र आले होते. चर्चेदरम्यान दुस-या एका मित्राचा फोन काकांना आला. त्याने काकांना विचारले,’’आपण आजारी असल्याचे मी ऐकले आहे, आता कसे वाटते आहे’’ काका म्हणाले,’’ होय, थोडा आजारी पडलो होते मात्र जेव्हापासून मी नव्याने तपासणी केली आहे तेव्हापासून मला बरे वाटायला लागले आहे’’ हे ऐकताच मित्राने नव्या तपासणीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काका म्हणाले,’’ मी आजाराबाबत विचार करणेच सोडून दिले आहे आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्हणून सिद्ध झाला आहे. एखादा पाहुणा चांगला पाहुणचार केल्यामुळे जास्त दिवस मुक्काम करतो तेच त्याच्याशी उलटपक्षी वागले असता म्हणजेच घरातल्यांशी जसे वागतो, तशी साधी वागणूक मिळाली, विशेष पाहुणचार न मिळाल्यास तो अशा घराचा रस्ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्य केले जाईल. आजाराबाबतीतही माझा हाच विचार आहे.’’ काकांच्या नव्या उपचार पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले.
तात्पर्य :- आजारापेक्षा जास्त त्याची चिंता तणाव वाढवते. त्यामुळे कोणत्याही शारीरिक अस्वस्थतेला सकारात्मक विचाराने घेण्याचा प्रयत्न करा.
क्रोध
एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती. पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,’’तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’
तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते.
राजा जनक आणि ऋषि अष्टावक्र
राजा जनक राजा असूनही त्यांना राजवैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहात. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरुच असे.
एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरुच ठेवला. अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले,’’माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंच आवाजात म्हणणे आहे. मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणे किंवा त्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते.’’
तात्पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.
प्रामाणिक मुलगा
एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्याशेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला, शेजा-याने त्याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस'' मुलगा म्हणाला,'' इथेच कोणीच नव्हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला,'' आपण करतो ते आपला आत्मा पाहात असतो, आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल.''
तात्पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्यास मुले भविष्यात योग्य वर्तन करतील. वाईट गुण घेण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडीलांना येतो.
हि-यापेक्षा जनता महत्वाची
एक राजा होता. त्याचे सुखी व संपन्न राज्य होते. दुर्दैवाने एकदा त्याच्या राज्यात पाऊसच पडला नाही. त्यामुळे दुष्काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्याने त्याच्या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परिस्थिती सांगा. तो राजा आपली अवस्था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्या बदल्यात त्याच्याकडून धान्य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्हणाला,''माझे राज्य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्हा प्राप्त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''
तात्पर्य :- आपल्या हाती जर सत्ता असेल तर त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्ट ठरते.
लोभाची शिक्षा
एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस
तात्पर्य – लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्यक आहे.
महिलेचा निर्भीडपणा
एकदा खलिफा उमरला जनतेस मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी खलिफांना प्रश्नही विचारले. त्यांची खलिफानी समाधानकारक उत्तरेही दिली. खलिफाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्स्युक्य असणा-या लोकांच्याही प्रश्नांची उत्तरे दिली. याच क्रमाने खलिफाने लोकांना प्रश्न केले. तो म्हणाला,'' जर मी तुम्हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय'' मोठ्या संख्येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्हटले,'' नाही, आम्ही तुमचा आदेश पाळणार नाही.'' हे ऐकताच गर्दीतूनही राग व्यक्त झाला. खलिफाने सर्वांना शांत राहण्यास सुचविले. त्या महिलेला याचे कारण विचारले असताती म्हणाली,''तुम्ही तुमचा पायजमा खूपच लांब घातला आहे. माझ्या पतीचा पायजमा गुडघ्यापर्यंतही येत नाही यावरून असे स्पष्ट होते की तुमच्या शाही भांडारामध्ये तुम्ही तुमच्या हिश्श्यापेक्षा जास्त कपडा घेतला आहे.'' महिलेला यातून असे सुचवायचे होते की खलिफाचे बोलण्याप्रमाणे वर्तन नाही. यावर खलिफा म्हणाला,''मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल.'' खलिफाचा मुलगा पुढे आला व त्याने सांगितले,''माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्श्याचे कापड मी वडिलांना दिले. सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्यात मी वाढ केली'' महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर खलिफा नाराज न होता त्या महिलेला धन्यवाद देऊ लागले कारण खलिफाच्या मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक असणार नाही तोपर्यंत राज्याला किंवा धर्माला धोका नसतो.
आत्मनियंत्रणाचे महत्व
एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले,''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते.
तात्पर्य :- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.
साधू आणि यक्ष
एक साधू तपश्चर्येस एका निर्जन स्थळी बसले होते. त्या ठिकाणी एका यक्षाचे वास्तव्य होते. या गोष्टीची साधूला कल्पना नव्हती. ते जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा निर्जन स्थान पाहून त्यांनी तेथेच ध्यानधारणा सुरु केली. त्या वेळी यक्ष तेथे नव्हता. रात्री जेव्हा यक्ष तेथे आला तेव्हा आपल्या जागेवर दुस-यास व्यक्तीला पाहून त्याला राग आला. त्याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्थेत असलेल्या साधूवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्यांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ध्यानस्थ असल्याने त्यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्याचा प्रयत्न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्हा अशा जंगली प्राण्यांची रूपे घेतली तरी साधूच्या ध्यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्याने विषारी सापाचे रूप धारण करून त्यांना दंश केला तरीही त्यांच्यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्या प्रयत्नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्याने यक्ष झालेल्या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्या कृपादृष्टीने सापाच्या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्याने त्यांना आदरपूर्वक वंदन केले.
तात्पर्य – एकाग्रता, स्नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो.
धर्म म्हणजे काय ?
एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्ठ धर्माचे महत्व समजावून सांगेल त्याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्या धर्माचे महत्व समजावून सांगण्यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्ट आठवणीने करत होते की स्वत:च्या धर्माचे महत्व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्या धर्माची निंदानालस्ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे व त्यामुळे तो दु:खी होत होता. पण त्याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला. राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर त्याने साधूला नमस्कार केला व म्हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्ठ धर्माच्या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,''सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात अस्तित्वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्यक्ती निष्पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्या. साधू राजाला म्हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्येक नावेपाशी जाताच साधू त्या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्हटले,''महाराज आपल्याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्याला स्वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.
खरा वेडा कोण
एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी अनेक मानसशास्त्रीय चाचण्यांना तोंड द्यावे लागत असे. त्यातील शेवटच्या चाचणीमध्ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्यातील फक्त एकच गोष्ट त्याला उचलण्यास सांगितली जाई. वेड्याने पन्नास रूपये उचचले की त्याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्यास त्याला पुन्हा एकदा चाचण्या पार करायला सांगितल्या जात. गरज पडल्यास पुन्हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्पीटलमधील एक वेडा शेवटच्या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्या पटापट पार करत असे मात्र शेवटच्या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्यावर चाचणी घेणारे डॉक्टर कंटाळले व त्यांनी एक युक्ती केली पुढच्या वेळेला त्या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्या आरामात पार करतोस आणि शेवटच्या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्वत:लाच करावा लागणार आहे. त्यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्नास रूपयांची नोट उचलून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून का म्हणून घेऊ''
No comments:
Post a Comment